कविता

स्वत:ला हळवं, कातर करून
वार्यावर द्यावं लागतं सोडून...
झरत जाते मग एक कविता
बोटांतून कागदावर,
ओठांतून मनावर...

डोळ्यांत स्वप्न हलतात लकलक,
मनाची घालमेल,
जीवाची तगमग..

कधी आपलं कधी परकं ,
दु:ख घालत राहतं साद..
अथांगाच्या पोकळीत
विरत जातो एक पडसाद..
शब्दांमध्ये त्याला
पकडत जाते तरलता,
शक्य अशक्यांच्याही
पडतात गाठी बरेचदा

टिपत राहतं मन मग..
पुसटसं क्षितीज
विरलेली कोर,
हरवलेला पाऊस
नभ भावभोर..
काळवंडली वेदना
सुखाचे मोर,
अन्
साकळला अश्रू
चांदणं टपोर....

आणि तू विचारतोस ,
कविता सहजच सूचत असेल ना?

-बागेश्री

Post a Comment

0 Comments