पूर्णान्न

पोटात हलकीशी भूक घेऊन केलेला स्वयंपाक जास्त रुचकर होतो असा माझा स्वतःचा अनुभव. छान भूक लागलेली असताना चवीचं ज्ञान जास्त सजग असतं. अशावेळी हा गरमा गरम पदार्थ जर आता पानात येणार असेल तर तो मला कशा चवीचा खायला आवडेल ह्या विचारातून योग्य मसाले पडत असावेत. मसाल्यांच्या वासावरून चव ताडता येते. वैयक्तिक आवडीतून केलेलं जास्त युनिव्हर्सल हा जगाचा नियम!
त्यामुळे पदार्थ उत्तम होण्याची हमी! भरपेट खाऊन स्वयंपाकाला उभे राहिले की चवीचं ज्ञान शिथिल होऊन जातं. (आपल्यासकट त्यालाही आळस चढत असावा 😃)
          म्हणजेच हाताच्या चवीपेक्षा रसनेची चव महत्वाची. त्यामुळे अनेकदा "फुडी" माणसे उत्तम स्वयंपाक करताना दिसतात. थोडक्यात काय तर खाणे आणि खाऊ घालणे ह्यांत ज्याला मनापासून रुची आहे त्याच्या हातून रुचकर स्वयंपाक होतोच.. पाक करताना
करणा-याचं मन जितकं शांत व सकारात्मक तितके समाधान खाणा-याला नकळत लाभते असाही माझा दृढ समज आहे. चिडचिड, तणतणत केलेला स्वयंपाक फायद्याचा नसतो, कारण अन्न बनवणा-याची मानसिकता अन्नरसात उतरते. म्हणूनच पूर्वी संस्कृत श्लोकोच्चार करत अन्न सिद्ध केलं जायचं... ते सकस आणि उत्कृष्ट असायचं.

खरं तर शांत मनाने, मायेने शिजवलेलं अन्न आपोआपच असं सिद्ध होत असावं... हीच माझ्यालेखी "पूर्णान्नाची" व्याख्या !

-बागेश्री

Post a Comment

2 Comments

  1. Atlas shrugged ह्या Ayan Rand ची जगप्रसिद्ध कादंबरी आठवली. त्यामधील नायिका स्वयंपाक करीत असताना तिला होत असलेला आनंद, मनाच्या प्रेमधारा आणि अर्पण करण्याचा भाव.....ह्या प्रसंगाची, माझ्या मनात कोरलेल्या रसपूर्ण दृश्याची अनुभूती, बागेश्री, तुझ्या ह्या लेखनातून प्रगट झाली आहे.धन्यवाद!

    ReplyDelete
  2. Waa... ते पुस्तक माझं वाचायचं राहूनच गेलंय

    ReplyDelete