उत्तर

कान्हा,
तू जनपद प्रवासाला निघालास तेव्हा
प्रत्येकाच्या चेहऱ्यावर
पाहिली मी आशा
की, तुझी भेट होत राहील..
ज्या गोकुळाने
तुझ्या बाललीला पाहिल्या
त्या गोकुळाशी तुझी नाळ
जोडून राहील
त्या आशेला
खोट्या आश्वासनाचे उत्तर देत गेले
तुझे भावगर्भ डोळे
पण, कान्हा
मला खात्री होत गेली
की आता नाही!
पुन्हा ही नजर
नाही उतरणार
माझ्यात खोल थेट
ही शेवटची,
शेवटचीच भेट..
त्या प्रेरणेला
प्रमाण मानून
अधीर होऊन
बसले विचारून
"मी येऊ? येऊ मी, तुझ्यासोबत?"
तुझ्या उत्तरावर मुकुंदा
माझा उधळलेला संसार
उरलेलं आयुष्य
टाकले मी सोपवून
घुमले तुझे उत्तर
प्रतिप्रश्न होऊन,
"काय ओळख देऊ राधे, काय म्हणून नेऊ?"
कुंजवनातले लक्ष प्रहर
माझ्यासाठी आळवले
वेणूचे आर्त स्वर
एकांत समयी आपल्यावर
बरसणारा आम्रमोहर
यापैकी कुणी कुणीच नाही उभे पुराव्याला
जिथे तुलाच हा प्रश्न पडला
तिथे द्यावे उत्तर कुणी कुणाला
की, मी,
मी तुझी आहे कोण??

माझी सैरभैर अवस्था पाहून
त्वरेने घेतलेस सावरून..
"अंतर पडले कितीही तरी
तू दिलेली ही वैजयंतीमाला राधे,
वागवीन मी माझ्या उरी.."
मी हसले..
समाधानाने हसले कान्हा
त्याच फुलांचा
निःस्वार्थ सुगंध
मिळवून देणार होते
तुझे तुला उत्तर,
विरह दुःखाने
करून तुला कातर!

-बागेश्री

Post a Comment

0 Comments