कधी असे तर, कधी तसे रे..

उन्हात रणरण चालत जाता
वाटेवरल्या उभ्या मोडक्या
मंदीराच्या त्या वळणावर
कधी मंदशी, झुळुक होऊन

पाणी पाणी जीव होताना
कुठून अचानक येतो कोणी
ज्याची माझी ओळख नाही
जातो नीर माडाचे देऊन

मनात येते गाणे गावे
शब्द मिळेना सूरही नाही
तेव्हा अवचित आली कविता
आकाशाचे गाणे होऊन

चिंब जागत्या कृर रात्रीचा
डंख काळसर डोळा रुतता
दूर अंधूक कंदिल होउन
होतास तिथे, मिणमिण करता...
तुला वाटते, भेट आपली
उशिरा झाली फार फार पण
जगून गेले आहे तुजसव
अनेकवेळा, अनेक क्षण मी..
कधी असे तर, कधी तसे रे !!
-बागेश्री

Post a Comment

0 Comments