स्थिरावलेला शांत डोह
कितीतरी वेळ पहात बसले....
त्याच्या स्वच्छ तळासारखं मन झालं,
तेव्हा तंद्री भंगली...

आता उठावं, म्हणत
हातावर तोल पेलताना
धप्पकन काही पाण्यात पडलं...
डोह, गढूळला...!!

तसं दूरवर, माझ्याशिवाय कुणीच नव्हतं....
कुणीही नव्हतं!

न रहावून,
तत्परतेने डोहात हात घातला,
कशामुळे गढूळला, शोधण्याची धडपड केली..
तो हाती आली 'एक हळवी भावना'...
मनाच्या तळाशी कधीतरी मुडपून ठेवलेली...

भावनेने घातलेला हा गोंधळ शमेलही,
वास्तवाचा खळबळला डोह शांत होईलही..
पण;

वास्तवाला पुन्हा एकदा नितळपणे स्वीकारण्याठी,
पडणार्‍या प्रयासातून
आता, सुटका नाहीच.....!