गरजा

गरजांच्या भिंती भक्कम असतात
आपणच त्या उभ्या करतो आपल्या भोवती
आणि आत सुरक्षित वाटू लागतं
मग बांधत बसतो
इमल्यावर इमले!
नसतं धाडस आपल्यात
भिंती मोडून बाहेर पडण्याचं
उलट आपण पसंत करतो
डागडुजी!
त्यांना अधिक बळकट करण्यासाठी..

कधीतरी गुदमर वाढेल.....

कधीतरी गुदमर वाढेल आणि
लक्षात येईल
आपण ठेवली नाहीए एखादी खिडकीही
कारण नकोच होता 
धाडसी सूर्यकिरण
वेडा वारा आणि बेभान आकाश
ज्यांनी साद घातली असती
आणि आपले इमले कोसळले असते....

आपण आपल्याच गरजांच्या कोषात
माणूसघाणेपण घेऊन
एके दिवशी
संपून जाणार आहोत..

Post a Comment

0 Comments