एखाद्याच्या मनापर्यंत पोहोचणे आणि आपण पोहोचलो आहोत असा समोरच्याने आपल्याला भास होऊ देणे यात ओळखू न येणारं अंतर असतं. त्या भासावर विसंबून आपण मजेत दिवस घालवू लागतो आणि कधीतरी भ्रमाचा भोपळा मोठा आवाज करत फुटतो. तेव्हा विचारचक्र गरगरू लागतं. चूक कुणाची, दोष कुणाला या गर्तेत फिरू लागतं. कदाचित तुमचे प्रयत्न पाहून समोरच्याने समाधानापुरता, तो भास तुमच्यापुढे उभा केला असेल. किंवा तो भास आहे याचा पडताळा घेण्याची हुशारीच तुमच्यात नसल्याने तुम्ही निर्धास्त असाल. काहीही असो, पण एकदा सत्य कळलं की ते त्याक्षणी स्वीकारून टाकावं. स्वतःकडे केविलवाणं होऊन पाहू नये. मिळालेली हुशारी पदरात पाडून, जगण्याला शहाणपणाचा एक लेप मात्र नक्की मारावा.
-बागेश्री