काही अनुभव खडखडीतपणे वास्तव समोर आणतात. स्पष्ट. थेट. खरे बोचरे वास्तव. त्या क्षणी त्या अनुभवाची किंमत लाखमोलाची. आपल्याला चिकटलेलं बरं वाईट ह्या अनुभवाने वेगळं होतं. गळून जातं. आपण केवळ सत्य होऊन जातो. ह्याच क्षणी स्वतःला करडेपणे स्वीकारून टाकावं. स्वच्छ नितळ व्हावं आणि व्हावं साक्षीदार आशेचे मनोरे कोसळतानाचे.
             पण, आशेइतकं चिवट दुसरं काहीच नाही. ती अगदी काही काळातच नव्या उमेदीने पुढचा मनोरा बांधायला घेते, नव्या बांधकामाला आपलाही हातभार लागतो. आपण एकच करावं, ठरवून, गुंतवू नये फार आपलं मन, दगड - विटा - वाळूत. मग ढासळणंही पाहता येतं, लांबून, एखाद्या त्रयस्थासारखं.
-बागेश्री